बंद

नाथ षष्ठी दिंडीतील वारकऱ्यांनी कोविड लस घेणे आवश्यक – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 21/03/2022

  • नाथषष्ठी सोहळ्यात कोविड नियमांचे सर्वांनी पालन करण्याचे आवाहन
  • सर्व व्यवस्थेसह चोख बंदोबस्त ठेवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

औरंगाबाद, दिनांक 20 (जिमाका)  : राज्यासह इतर राज्यातून लाखो भाविक पैठणच्या नाथ षष्ठी सोहळ्यासाठी येतात. यामध्ये जवळपास 600 दिंडी दाखल होतात. या दिंडी प्रमुखांनी पैठणमध्ये दाखल होण्यापूर्वी त्यांच्या  दिंडीतील सदस्यांसह कोविड लस घेणे आवश्यक आहे. तसा लस घेतल्याबाबतच्या पुराव्यासोबत ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्सही सोबत असू द्यावे, अशी विनंती जिल्हाधि‍कारी  सुनील चव्हाण यांनी नाथ मंदिर विश्वस्तांमार्फत सर्व दिंडी प्रमुख आणि भाविकांना केली आहे. *त्याचबरोबर शासनाने सांगितलेल्या कोविड नियमांचे पालन करण्याच्या अटी शर्तींच्या अधीन राहून नाथ षष्ठी सोहळ्यास परवानगी देण्यात येत असल्याचेही चव्हाण म्हणाले.*

जिल्हाधिकारी कार्यालयात  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे,  निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, तहसीलदार डी.बी. निलावाड, उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ.  विशाल नेहूल, नाथ वंशज रघुनाथबुवा गोसावी, योगेश गोसावी, मधुसुदन रंगनाथबुवा, छैय्या महाराज गोसावी, हरिपंडित गोसावी,  विनित गोसावी, श्रेयस गोसावी,  नगर पालिका मुख्याधिकारी संतोष आगळे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सु.सो. शेळके, डॉ.पी.एम. कुलकर्णी आदींसह सर्व यंत्रणांचे प्रमुख आदींची उपस्थ‍िती होती.  

नाथ षष्ठी  निमित्त 20 ते 25 मार्च या कालावधीत पैठणमधील चार विविध ठिकाणी लसीकरण पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे. यामध्ये 20 व्हॅक्सीनेटर एकाच वेळी लस देऊ शकतील, अशी यंत्रणा आरोग्य  ‍विभागाने तयार करावी.  याशिवाय 10 व्हॅक्सीनेटर अधिक असतील, याचीही व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी आरोग्य  विभागाला  दिल्या.

पैठणमध्ये भाविक दाखल होण्यास सुरूवात होत असल्याने पाटबंधारे  विभागाने 20 ते 25 मार्च या कालावधीत गोदावरी नदीपात्रात 1.00 Mcum पाणी सोडण्यास सुरूवात करावी. यासाह पोलिस यंत्रणांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवावा. वीज  विभागाने लोडशेडिंग होणार नाही, याची दक्षता घेत आवश्यक त्याठिकाणी जनित्रांची व्यवस्था करावी. नगर पालिका प्रशासनाने आवश्यक त्या कामांसह स्वच्छतेवर भर द्यावा. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने औरंगाबाद-पैठण रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने आवश्यक त्या साधनसामुग्रीसह पथके तयार ठेवावीत, आरोग्य यंत्रणांनी मुबलक औषध साठ्यांसह आरोग्य पथके नेमावीत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी संबंधित यंत्रणांना  दिल्या.

श्री. गटणे, नाथ वंशजांसह, मंदिर  विश्वस्त,  अधिकारी यांनीही बैठकीत सूचना मांडल्या, त्यावरही श्री. चव्हाण यांनी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

नाथ षष्ठी दिंडीतील वारकऱ्यांनी कोविड लस घेणे आवश्यक