वीज जोडणीसह सुरळीत वीज पुरवठा देण्यासाठी महवितरणने अधिक प्रयत्न करावेत – सुनील चव्हाण
प्रकाशन दिनांक : 12/07/2021
औरंगाबाद, दिनांक 09 (जिमाका): शेतकऱ्यांना मदत करणारा विभाग म्हणून महावितरण् काम करतो. उद्योग, शेती तसेच घरगुती वीज वापरासाठी वीज जोडणी व सुरळीत वीज पुरवठा करण्याबरोबरच थकीत देयकाबाबत कार्यवाही यासंदर्भातील नियोजन करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी तथा महावितरणचे प्रभारी सहव्यवस्थापाकीय संचालक सुनील चव्हाण यांनी महावितरणच्या बैठक कक्षात आयोजित कार्यकारी अभियंता यांच्या आढावा बैठकीत दिले.
यावेळी बैठकीला औरंगाबाद परिमंडाळाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे, नांदेडचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, तसेच लातूर परिमंडाळाचे मुख्य अभियंता रविंद्र कोलप, तसेच आठही जिल्ह्याचे सर्व अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
वीज देयक भरण्याबाबत थकीत रक्कमेचे समान हफ्त्यात नियोजन करुन देयकाची रक्कम वेळापत्रकानुसार भरण्याबाबतच्या सूचना संबंधित वीज ग्राहक यंत्रणेला दिल्या. त्याबरोबरच वीज चोरी आणि वीज गळती यातील प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, तसेच देयकाच्या तक्रारीचे निरसण करुन वीज देयकाचे योग्य रक्कम भरण्याबाबत प्रवृत्त करुन लोकांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करावा असे सांगून श्री चव्हाण म्हणाले की आठही जिल्ह्यातील वीज निरिक्षकांनी वीजेमुळे जखमी किंवा मृत्यू झालेल्या नागरिकांना योग्य ती आर्थिक मदत मिळून देण्याबाबत पुढाकार घ्यावा असे आवाहनही श्री.चव्हाण यांनी केले.
संबंधित अर्जदाराच्या तक्रारीचा निपटारा करुन मदत करावी यासाठी वीज निरिक्षकांचे अहवाल प्रलंबित न राहता संबंधित परिमंडाळाने मानवी दृष्टीकोनातून मदत करावी. त्याच प्रमाणे वसुली न होणाऱ्या प्रकरणात एफ.आय.आर दाखल करण्याच्या सूचना प्रभारी व्यवस्थपाकीय संचालक सुनील चव्हाण यांनी तीनही परिमंडाळातील आठही जिल्हयातील उपस्थित कार्याकारी अभियंता यांना दिल्या.
