बंद

लोकशाही सुदृढ व सक्षम बनविण्यासाठी मतदान करा- जिल्हाधिकारी उदय चौधरी

प्रकाशन दिनांक : 01/04/2019

औरंगाबाद- दि ३१ (जि मा का) लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विविधांगी विकासाला चालना मिळणार आहे. यासाठी देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे नितांत गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले. 

विद्यापीठ कॅम्पस मधील आंबेडकर महाविद्यालयात आयोजित मतदान जागरूकता मरेथॉन दौडच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालया तर्फे आयोजित RUN FOR DEMOCRACY या महा मॅरेथॉनमध्ये सुमारे ५०० जणांनी सहभाग नोंदवला. 

सुरुवातीला मतदानाच्या प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करण्यात आले.  विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ रविंद्र सिंघल आणि जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी झेंडा दाखवून मरेथॉनला प्रारंभ केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, निवडणूक नायब तहसीलदार मिलिंद धनंजकरआदी उपस्थित होते. 

पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, मतदान प्रक्रियेप्रती आजचे युवक जागरुक  व्हावेत तसेच त्यांनी राष्ट्राच्या विकासाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडावी यासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या युवक-युवतींना मतदानाचा हक्क देण्यात आलेला आहे. मतदान करणेसुद्धा देशसेवेचाच एक भाग असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. चौधरी  यांनी सांगितले.

शहरातील ‘ब्लॅक बडस्’ या सामाजिक संस्थेने या मॅरेथॉनमध्ये पुढाकार घेतला. ही मॅरेथॉन १५ की.मी, १० की.मी आणि ५ की.मी अशा तीन टप्यात विभागलेली होती. आंबेडकर महाविद्यालय पासून सुरू झालेल्या मॅरेथॉनचा प्रवास लिटील फ्लॉवर स्कूल, विद्यापीठ गेट, मुख्य इमारत, गोगा बाबा टेकडी, विद्यापीठ लेणी परिसर पासून ते पुन्हा आंबेडकर महाविद्यालय असा होता. मरेथॉनच्या शेवटी सर्व सहभागी नागरिकांना सहभागाबद्दल प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

******

लोकशाही सुदृढ व सक्षम बनविण्यासाठी मतदान करा - जिल्हाधिकारी उदय चौधरी