बंद

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 04/05/2021

औरंगाबाद, दिनांक 3(जिमाका)- जिल्ह्यातील काही दिवसांपासून वाढत असलेली कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यात सर्वांच्या प्रयत्नांना यश येत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. यापुढेही कोविड- 19 प्रतिबंधक कामातील सर्व अधिकाऱ्यांनी अतिशय दक्ष राहून काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या लोकप्रतिनिधी सोबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी खा. डॉ. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, जिल्हा परिषद अध्यक्षा मिनाताई शेळके, आ. अंबादास दानवे, आ. संजय शिरसाठ, आ. अतुल सावे, आ. उदयसिंह राजपूत, आ. हरीभाऊ बागडे यांच्यासह महानगर पालिक आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, घाटीच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, मनपा आरोगय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्यासह संबंधित सर्व यंत्रणा प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून कोरोना बाधितांची संख्या देखील नियंत्रणात आणण्यात आली असून यात प्रशासनासह सर्व नागरिकांचा, लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून हे शक्य झाले आहे. तरी यापुढील काळात ही अशीच शिस्त कायम ठेवण्यास नक्कीच कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीशी आपण सामना करु शकू असे सांगून श्री. चव्हाण म्हणाले की, जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सीजन साठा उपलब्ध आहे. तो सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने खाजगी रुग्णालयांनी स्वत:चे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु केले आहेत तसेच घाटी, जिल्हा रुग्णालय, मेल्ट्रॉन या ठिकाणी ऑक्सीजन साठा वाढविण्यात येत असून ऑक्सीजन उपलब्धता सक्षम ठेवण्याच्या दृष्टीने गंगापूर, वैजापूर, कन्नड, सोयगाव, पैठण आदी ग्रामीण भागात ही ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून प्रकल्पासाठी 6 कोटी 60 लाख इतक्या निधीला मान्यता देखील मिळाली आहे. ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे काम सी.एस.आर मधून चालू करण्यात आले असून या प्रकल्पातून एकूण 11 kl इतक्या ऑक्सीजन सिलेंडरची निर्मिती होणार असल्याचे श्री चव्हाण यांनी सांगितले.

मनपा आयुक्त श्री. पाण्डेय म्हणाले की रोज शहरात 5000 टेस्टींग होत असून शहरात कॉन्टेक्ट ट्रेसींग देखील नियमित होत आहे.

भविष्यातील तिसऱ्या लाटेकरीता प्रशासन तयारीत असून त्याचाच एक भाग म्हणून मनपा डॉक्टरांना आय.सी.यु मध्ये वापरात येणाऱ्या विविध यंत्राचा वापर कसा करावा याकरिता या डॉक्टरांना घाटीमध्ये प्रशिक्षणाकरीता पाठवण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.

खा. डॉ. कराड म्हणाले की शहरातील अतिरिक्त व्हेंटीलेटर चा उपयोग हा घाटीमधील व्हेटींलेटर बेड वाढवण्याकरिता सूचित केले.

दिवसेंदिवस रुग्णालयात आग लागण्याचे प्रमाण वाढत असून प्रत्येक रुग्णालयात नियमित आगप्रतिबंधात्मक उपाय योजनांची तपासणी करण्याचे खा. जलील यांनी सूचित केले.

आ. श्री. उदयसिंह राजपूत यांनी कन्नड मध्ये एम.डी फिजीशीयन डॉक्टर उपलब्ध करुन द्यावा असे सूचित केले. सीएसआर फंडातून घाटीला देण्यात आलेले व्हेंटीलेटर कार्यान्वित करण्यात आले काॽ शहरात होत असलेले कॉन्टॅक्ट ट्रेसींग, चिकलठाणा येथील शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीनची दुरुस्ती लवकरात लवकर करावी असे, असे आ. अतुल सावे यांनी सूचित केले.

आ.श्री. बागडे यांनी आमदार निधीतून ॲम्ब्युलन्स घेऊ इच्छित असल्याचे सांगितले. शहरात उपलब्ध असलेले व्हेंटीलेटर मराठवाड्याच्या बाहेर न देता आपल्या जिल्ह्याची गरजा पूर्ण करण्याचे सर्व आमदारांच्या वतीने सर्वानुमते सूचित करण्यात आले.

जिल्ह्यातील कोरेानाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात