जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा
प्रकाशन दिनांक : 18/08/2020
औरंगाबाद, दि. 17 (जिमाका) : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पदभार स्विकारल्या नंतर लगेच जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच जिल्हाधिकारी हा प्रशासनाचा चेहरा असल्याने आपण सर्वांनी टीम औरंगाबाद म्हणून समन्वयाने काम करुया असा विश्वास व्यक्त केला. कोरोनाचा प्रसार रोखणे आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढविण्यावर आपला प्रमुख भर असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर, महानगरपालीकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले की, मी मराठवाड्याचा असल्याने येथील परिस्थितीची माहिती आहे. कोरोना परिस्थितीचा सामना करण्यासाठी येथील घाटी, जिल्हा रुग्णालय, महानगरपालीका रुग्णालय तसेच ग्रामीण भागातील रुग्णालयातील समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याची ग्वाही दिली. कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये या संकटावार मात करण्यासाठी आपल्या सर्व यंत्रणांचा योग्य वापर झाला पाहिजे. त्यामुळे या संकटाच्या काळात आपल्याला इतिहास घडविण्याची एकप्रकारे संधी असल्याचे सुनील चव्हाण म्हणाले.
अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी शहरी भागात तीन तर ग्रामीण भागात 19 कंटेन्मेंट झोन असून आतापर्यंत एकूण कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या 18801 एवढी आहे. त्यापैकी 13884 रुग्ण बरे झाले तर 589 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 4328 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती दिली. यावेळी श्री. गोंदावले यांनी जिल्हा परिषदेद्वारे ग्रामीण भागात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसंबंधीत डाटा एंट्रीचे कामही चालू असल्याचे सांगितले. कोरोना परिस्थितीची यावेळी घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता श्रीमती येळीकर यांनी कोरोना आजारावर रुग्णालयामार्फत करण्यात येणाऱ्या उपचार, सेवा, सुविधा, प्लाझ्मा चाचणी आणि उपचार याविषयीची माहिती दिली. तसेच मनपा वैद्यकीय अधिकारी पाडळकर यांनी शहराच्या सहा प्रवेशद्वारांवर शहरात येणाऱ्या नागरिकांची अँटीजन चाचणी करण्यात येत असल्याची तसेच इतर उपायोजनांबाबत माहिती दिली.
