जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ मन मे है विश्वास ’ उपक्रमाचे 13 रोजी आयोजन
प्रकाशन दिनांक : 08/10/2020
कोरोनातून बरे होण्याचा विश्वास वाढवण्यासाठी उपक्रमाचे आयोजन
औरंगाबाद, दि.07 (जिमाका):- जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे वाढत असून नागरिकांच्या मनोधैर्याला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या संकल्पनेतून कोरोना मूक्त झालेल्यांच्या सहकार्याने मन मे है विश्वास हा नाविन्यपूर्ण उपक्रम 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता राबवण्यात येणार आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या उपक्रमाच्या नियोजनाबाबतच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी उपक्रम यशस्वीतेच्या दृष्टीने सर्व संबंधितांना सूचना दिल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, मंदार वैद्य, महादेव किरवले, तहसिलदार तेजस्विनी जाधव यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी समाजात कोरोना विषयीची भीती दूर करुन कोरोनातून लवकर बरे होण्यासाठीचा सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा, यासाठी ‘ मन मे है विश्वास ’ या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी संबंधितांना निर्देशित केले.
वेळीच योग्य ती खबरदारी व औषधोपचार घेत अनेक कोरोना योध्यांनी कोरोना संसंर्गावर यशस्वी मात करुन जगण्याचा विश्वास निर्माण केला आहे. कोरोनातून बरे झालेल्यांनी प्रेरणादायी आणि सकारात्मक वृत्तीने कोरोनाला हरवण्याच्या अढळ विश्वासाने या आजारावर मात केली आहे. यामध्ये विविध प्रशासकीय अधिकारी कर्मचारी , आशा वर्कर, नर्सेस, त्याचप्रमाणे पोलीस आरोग्य यंत्रणा , पत्रकार, प्रसार माध्यमात काम करणारे विविध घटक, व्यावसायिक , शेतकरी यासह इतर अनेक घटक यात महिला, बालक, वृध्द, विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेले नामवंत व्यक्ती यांनी देखील कोरोनावर यशस्वी मात केलेली आहे.
या मधील काही प्रातिनिधीक व्यक्तींचा सन्मान कोरोना योध्दा म्हणून ‘ मन मे है विश्वास ’ या उपक्रमात करण्यात येणार असून त्याचे मन मे है विश्वास या गीतावर दृकश्राव्य माध्यमातून चित्रीकरण करण्यात येणार आहे. हे चित्रिकरण समाज माध्यमे, प्रसार माध्यमांव्दारे प्रसारित करण्यात येणार आहे.
