कोरोना संसर्गापासूनच्या बचावासाठी लसीकरण प्रभावी उपाय -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बजाज’ च्या लसीकरण केंद्राचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन
प्रकाशन दिनांक : 28/05/2021
औरंगाबाद, दिनांक 28 (जिमाका) :- कोरोना संसर्गापासूनच्या बचावासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. तरी सर्व नागरिकांनी जिल्हयाच्या लसीकरण मोहिमेत सक्रीयपणे सहभागी होत स्वत:सह सर्वांचे कारोना संसर्गापासून संरक्षण करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज वाळूज येथील बजाज कंपनीच्या कोविड 19 लसीकरण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी केले.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, बजाज ग्रुपचे मुख्य सल्लागार सी.पी.त्रिपाठी, व्यावसायीक वाहन शाखेचे उपाध्यक्ष अभय पत्की, सुहास कुलकर्णी (मोटार सायकल शाखा), अनिल मोहिते यांचेसह संबंधित अधिकारी तसेच लसीकरणासाठी आलेले मोठया संख्येने कर्मचारी उपस्थित होते.
श्री. चव्हाण म्हणाले की कोरोना संसंर्गाच्या दुसऱ्या लाटेतील संसर्ग रोखण्यास सर्व यंत्रणांनी संघभावनेतून काम केले आहे. त्याच बरोबर लसीकरणामुळेही संसर्ग आटोक्यात येणास मदत झाली आहे. तसेच उद्योगांनी प्रशासनाला संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य केले आहे. त्यामुळे बजाज कंपनीच्या कोविड -19 लसीकरण उपक्रमाच्या माध्यापासून संपूर्ण कामगारांसह त्यांच्या कुंटुंबाचे लसीकरण केल्यामुळे इतर नागरिकांनाही लसीकरणाबाबत जागृती होऊन संपूर्ण लसीकरणांचे लक्ष साध्य होईल या लसीकरणाच्या माध्यमातून आपला जिल्हा कोरोनामुक्त होण्यास मदत होईल.
लसीकरण झाल्यावरही नागरिकांनी कोरोना नियमावलीचे पालन करणे आवश्यक असून स्वयंशिस्तही महत्वाची आहे. मास्क वापरणे, योग्य शारिरिक अंतर पाळणे, सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करणे, सतत हात धूणे या नियमांचे पालन करणे, त्याचबरोबर नागरिकांनी “ब्रेक द चेन” या मोहिमेला साथ देणे व संयम बाळगणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. यावेळी चव्हाण म्हणाले.
यावेळी जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले म्हणाले कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भाग अधिक संक्रमित झाला होता. ग्रामीण भागातील नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झाल्यास कोरोना मुक्त होण्यास मदत होईल. बजाज कंपनीने संपूर्ण कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांचेही लसीकरण करण्याच्या उपक्रमामुळे ग्रामीण जनतेतही जागृती होऊन तेही स्वत: लस घेतील.त्यामुळे कारोना संसर्ग कमी होण्यास मदत होईल.
यावेळी बजाज ग्रुपचे मुख्य सल्लागार सी.पी.त्रिपाठीयांनी कंपनीच्या कोविड-19 लसीकरण उपक्रमाबाबत माहिती देत कंपनीतील संपूर्ण कामगारांचे व त्यांच्या कुटुंबाचे शंभर टक्के लसीकरण केले जाणार असल्याचे सांगितले.
