कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रबळ उपाय योजना राबविणार – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशन दिनांक : 10/09/2020
औरंगाबाद,दि. 10 (जिमाका) –जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रबळ अशा उपाय योजना राबविण्यात येत असून त्यादृष्टीने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपलब्ध असलेल्या 200 बेड मध्ये अतिरिक्त बेडची वाढ करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी चिकलठाणा येथील सामान्य रुग्णालयालयास बुधवार 9 रोजी सायंकाळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच उपलब्ध असलेल्या सोई सुविधा बद्दल माहिती घेतली. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, डॉ. सुंदर कुलकर्णी, डॉ. मुतखेडकर, डॉ गायकवाड, डॉ कांबळे, डॉ पी.एम.कुलकर्णी, यांच्यासह डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थीत होते. यावेळी मा. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी कोविड लॅब, एक्सरे, मेडिकल स्टोअर, सोनोग्राफी, सिटीस्कँन, ICU, अपघात विभाग, पार्किंग आणि लिक्वीड ऑक्सीजन प्लान्ट च्या नियोजित जागेस मा.जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन पहाणी केली. तसेच याठिकाणी उपस्थीत असलेल्या डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या अडीअडचणी जाणुन घेऊन त्या दुर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मा.सुनिल चव्हाण यांनी कळवत डॉक्टर तथा कर्मचारी करत असलेल्या कार्याचे कौतुक केले.
